शनिवार, १४ सप्टेंबर, २०१९

आदरणीय भिडे मॅडम , मुंबई मेट्रो

आदरणीय भिडे मॅडम ,

स.न.वि.वि,

पत्र लिहिण्यास कारण कि, सध्या जे जंगल का बाग? हा वाद चाललंय त्या बद्दल. सध्या मुंबईकर खूप त्रस्त आहे , मेट्रो २०१९ होणार म्हणून आम्ही सगळं निमूट पणे, (कैकदा तुमची हिरहिरीने बाजू मांडून)  सहन केलं, तर आता तुम्ही म्हणता २०२१ मध्ये होईल, म्हणजे अजून दोन वर्ष त्रास? आणि काय सांगा २०२१ च २०२३ होईल , सरकार बदललं तर २०३१ पर्यंत हि होईल ह्याची खात्री नाही. तुम्ही आरे ची झाड कापून आमच्याच तोंडाला पान पुसताय असं वाटतंय हो आम्हाला. बोरिवली ते अंधेरी हा सगळ्यात जास्त ट्राफिक कोंडी होणारा रास्ता तो सुद्धा पाच वर्षात नाही होऊ शकत? हा रस्ता असाही हायवे वाला , म्हणजे जागा ताब्यात घ्या असं पण नाही, तरी दिरंगाई का? आणि भर म्हणून तुम्ही JVLR खणून ठेवला, पवई सुद्धा आणि LBS पण अडवलात, मिलिंद नगर ला तर भुयारी मार्ग झालाय पावसा मुळे, ८ तास नोकरी आणि ६ तास प्रवास, नोकरी ला पोहोचून लगेच घरी निघा आणि घर येताच नाही. हा संताप तुम्ही लक्षात घ्या. परवाच कुणी सांगितलं कि २०३१ पर्यंत सगळी मुंबई मेट्रोमय, उत्तम आहे, पण सरकारी कारभार पाहता हा आकडा म्हणजे, तुझ्या साठी चंद्र तारे आणून देईन ... हे वाक्य सुद्धा फिकं पडेल असंआहे . आणि प्रेमिका सारखं लोकांना हा आकडा पटतोय, नवल आहे.   उदाहरण मेट्रो ७ घ्या,  काहीही अडथळा नसताना २ वर्ष पुढे गेली.  तुमचे मेट्रोचे १० - १२ मार्ग आहेत (उद्या २४ होतील) , म्हणजे एका मेट्रोला दोन वर्ष उशीर तर १० मेट्रोना किती?  लावा हिशेब,म्हणून आम्ही जाणकार घाबरलो आहोत.   

आम्हाला मुख्यमंत्र्यांचं कौतुक आहेसच खूप गोष्टी करू घातल्या आहेत  त्यांनी, माणूस मुसद्दी आहे (आडनावंच फडणवीस, नाना गुण असणारच त्यांच्यात) हुशार आहे, पण मुंबई कडे थोडं दुर्लक्ष करतात. मला सांगा नागपुरात मेट्रो आमच्या आधी झाली, किती लोक जातात? नागपूरला द्या हो मेट्रो, बारामतीला सुद्धा द्या आमचा विरोध नाही.  सांगायचा मुद्दा असा कि चार काम घेऊन सगळीच अर्धवट टाकण्या पेक्षा एकच काम आधी पूर्ण करा, लोकांना विश्वासात घ्या,  मग लोक झाड काय? मान पण कापा म्हणतील. तर तो विश्वास नाहीये सध्या, सगळे मेट्रो अधांतरी आहेत, माणूस मेल्यावर कळशीभर पाणी देण्यात काय उपयोग? आधी चमचा चमचा द्या,   शुद्धीवर आणा मग हळू भांड्यात द्या. आम्ही मीठ भाकरी खात होतो ती घेऊन तुम्ही आम्हाला मेजवानी चा मोह दाखवला, पण पाणी सुद्धा आमच्या ताटातून घेतलत, भाकरी तर दूरची गोष्ट.... आम्ही नुसतं मेनू कार्ड बघतोय, त्यात रोज एक आयटम तुम्ही टाकताय, पण जेवण काही देत  नाहीत, नुसतं किचन दाखवताय (आणि खयाली पुलावाचा वास देताय) तर एक विनंती अशी कि एक तरी मेट्रो चालू करा, लोकांचा थोडा त्रास कमी करा मग बघा विरोध सुद्धा कमी होईल. 

आरे बद्दल तुम्ही म्हणताय ते बुद्धीला पटतंय मनाला नाही , ते ठीके म्हणा मुंबईकराला मन मारायची सवय झाली आहे आणि २ करोड लोक २ खड्डे नाही बुजवत तिथे आरे किस झाड कि पत्ती है? हे तुम्हाला हि ठाऊक आहे आणि आम्हाला हि. पण एक अहम मुद्दा असा कि तुम्ही ती एक जागा घेऊ शकत नाही कारण अतिक्रमण आहे आणि केस कोर्टात आहे ... तर उद्या तुमचं मेट्रो कार शेड आलं तर त्या लागत पन्नास टपऱ्या येणार १०० झोपड्या येणार ती लोक आणिक हजार झाड कापणार ... त्याच तुम्ही काही करू शकणार नाहीत, केस कोर्टात जाईल आणि हाच वाद माझी नात आणि सरकारी माणसाचा नातू  घालत बसतील... "बाप दाखव नाही तर श्राद्ध कर" अस झालं आहे आमचं.  मेट्रो दिसत नाहीये अजून आणि दोन वर्ष दिसणार नाही (म्हणजे ३ धरा ) असं तुम्हीच म्हणताय, खूप अन्त नाही पाहू कुणाचा. 

तुम्ही हुशार, कर्तबगार  आहात आणि फक्त तिथे नोकरी करता म्हणून ह्या वादात आहात, वयक्तिक तुमचा आदर आहेसच.  एकदा जमल तर आमच्या बाजूने (न दिसणाऱ्या) मेट्रो कडे बघा आणि काय तो तोडगा काढा. 


आपला, 

एक त्रस्त असूनही (अजूनतरी) विनम्र मुंबईकर 

सागर कुलकर्णी  

बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९

rickshaw, GDP and I

सध्या, मी सगळीकडे बस किव्हा रिक्षा किव्हा उबर नि जातो, शहाणा माणूस मुंबईत हल्ली गाडी चालवत नाही. (म्हणजे मी शहाणा आहे).  तर , पर्वा असाच रिक्षा नी जात असताना तो रिक्षावाला माझ्याशी गप्पा मारायला लागला, हल्ली काय हो दोन किलोमीटर ला जायला पण तास जातो, वेळ कसा घालवणार तो तरी ... सब धंदा डाऊन है, गाडी नही बिक्ती आज कल, सेल डाउन है म्हणाला, मी म्हंटल हो रे, पण माझी गाडी असून मी काढत नाहीये, नवीन गाडी कशाला घेईल कुणी? जवळ जायला रिक्षा, लांब जाईल उबर आहेच कि? उगाच कशाला कुणी इतके पैसे गुंतवेल आणि परत आता दंड पण वाढलाय .खड्डे किती आहे रस्त्यात, स्लो डाऊन नाही तर काय होणार? आधी रस्ते नीट करा पार्किंग द्या , उद्या गाड्या घेतील लोक, वैतागलेत लोक.....    "किधर नोकरी करते है म्हणाला", म्हंटल का रे? नाही म्हणजे तुला काय फरक पडेल, रिक्षा पुरते पैसे असतात माझ्या कडे अजून तरी, माझी इकॉनॉमी इतकी डाऊन नाही झाली अजून तरी (हे पुढलं मनात)? "नही मतबल कहा पे जाते हो, साफ्टवेर मे क्या?" म्हटलं हो, तभी इतना GDP डाउन है नही समझ मे आया आपको, थोडा फायनान्स का पढो,  पढते नही क्या"? म्हटलं काय? "व्हाट्सअप ... कितना सही सही आता है, नालेज के लिये पढो ... हम रोज पढते है, छे महिने मे नया नया  फोन लेते है हम " .... मी माझं शिक्षण त्याच्या  पेक्षा थोडं जास्त आहे आणि चार लोकं पेक्षा सुद्धा मी फायनान्स मध्ये दोन बुक अधिक वाचलीत अस सांगायचा मोह टाळला, हलली असं सुद्धा पुस्तकानं पेक्षा मोबाईल ला महत्व जास्त आहे आणि सगळेच सगळ्यात हुशार असतात ... आम्ही समजून सुद्धा अडाणीच ... का समजत म्हणून अडाणी कोण जाणे .... 


सोमवार, १३ मे, २०१९

Mothers day

गेल्या आठवड्यात, मेक्सिको मध्ये जिथे मी ट्रेनिंग देत होतो, तिथे तो जो मालक होतो तो आम्हाला शुक्रवारी संध्याकाळी त्या  गावातल्या, म्हणजे शहरातल्या डाउन टाउन मध्ये चक्कर मारायला घेऊन गेला. डाउन टाउन म्हणजे नंतर सांगेन, पण जिथे सगळी हॉटेल्स असतात मोठी ऑफिसेस असतात लोकांना फिरायला जागा असते तत्सम जागा. 

छान होती जागा थोडं युरोपिअन टच आणि लोक आपल्या सारखी दिसायला. रस्त्यात गाड्या लावून लोक काहीतरी विकत वगैरे होती, थोडी घाण पण होती, यूरोप सारखे चर्च होते (खूप होती, प्रत्येक चौकात चार).  आम्ही पाच पन्नास चर्च पहिली (पाच आतून आणि पन्नास बाहेरून). छान आहे शहर आपल्याहून थोडं श्रीमंत पण अमेरिकेच्या तुलनेत कमी. छोट्या गल्ल्या असल्या मुळे गाडी एके ठिकाणी उभी करून, आम्ही पायीच फिरत होतो, तो ऑस्कर (म्हणजे कंपनीचा मालक) आम्हाला थोडी फार माहिती पण देत होता. आम्हाला तो आणि त्या प्रोजेक्टचा डायरेक्टर एका लोकल मेक्सिकन ठिकाणी खायला (आणि टकीला प्यायला )नेणार होते, तो दुसरा माणूस येई पर्यंत थोडं गाव हिंडायला तो आम्हाला घेऊन आला होता. 

राउल नावाच्या त्या माणसाचा फोन आला, कि तो आलाय अमुक ठिकाणी म्हणून तो ऑस्कर म्हणाला चला जाऊया, चला म्हंटल. थांब नक्की कुठे आहे ते बघयाला हवय , असं म्हणून तो आम्हाला गल्ली बोळातून फिरवत होता आणि म्हणाला इथेच जवळ माझ्या मोठ्या बहिणीचं दुकान आहे, बघूया का  ती आहे का आता?  चला म्हंटल, गाईड च्या मागे जस टुरिस्ट जातात तस आम्ही त्याच्या पाठून गेलो. (आता तो मुद्दाम आम्हाला बहिणीच्या दुकानात नेतो आहे हे कळायला आम्हाला वेळ लागला नाही, कारण हॉटेल भलतीकडे आणि हा आम्हाला भलतीकडेच नेत होता आणि अरे हि का ती गल्ली? असा करत होता ). बहीण आर्टिस्ट आहे म्हणाला, ही सगळ्यात मोठी, मधली एक आणि मी, आता ह्याचाच वय ४२-४३, म्हणजे लावा हिशोब, चालताना एकदम एक छोटुकल्या दुकानात तो शिरला, यूरोप मध्ये , त्या town  square मध्ये अगदी १० बाय ८ अशी छोटी दुकान असतात ना? त्या ब्रुसेल किव्हा आर्म्सटरडॅम  ला आहेत तशी, किव्हा अगदीच गोखले रोड ला आहेत तश्या दुकानात शिरला, आत एक बाई पाठमोरी काहीतरी सामान ठेवत होती, हीच त्याची बहीण, बारीक सारीक होती, वय पन्नास का त्याच्या पुढे एखाद वर्ष असेल, त्याने हाक मारल्या वर मागे वळली आणि त्या ऑस्कर ला बघून इतकी खुश झाली, डोळे मिश्किल होते आणि भावला पाहून एकदम चकाकले, ती लोक अगदी पटापटा मिठ्या मारतात, अरेच्या इथे कसा? बघ किती दिवसाने आलास असं वगैरे म्हंटल असेल कारण ती लोक स्पॅनिश बोलली, मग भावाचे लाड करून झाल्यावर तिने आम्हाला बघितलं आणि हॅलो केलं. मला खूप गम्मत वाटली नवल नाही, वास्तविक आम्ही खरे तर फॉरेनर (म्हणजे त्यांना ), कुणी परक्या देशातील माणूस दिसायच्या आधी तिला भाऊ दिसला, एकाच गावात राहतात, म्हणजे फारा वर्षात भेट नाही असं नाही, पण दुकान नवीनच उघडलंय आणि हा एकदाच का दोनदाच गेला होता त्या आधी, म्हणून भाऊ आल्याचं कौतुक. 

ती स्वतः मूर्तिकार आहे, पण सध्या दुकानात लोकल हँडीक्राफ्ट ठेवते, जम बसला कि ठेवीन माझी कला कुसर , सध्या ह्यांचं ठेवते. आम्ही पण दोन चार वस्तू घेतल्या, मग तिचा थोडा गोधळ उडाला, मग त्या ऑस्कर नि चिडवलं कि माझी बहीण रंग ओळखते पण आकडे आले कि confuse होते, लगेच चिडली ना बहीण, अगदीच वर्मावर, बोट ठेवलं त्याने, मी दमलीये म्हणाली आज खूप लोक आली आणि नेमका तिचा पार्टनर कुठे तरी गेला होता , एरवी मी बरोबर करते. मग तिने त्या वस्तू दहा मिंट घालवून छान आर्टीस्टिकली पॅक केल्या. आम्हला थोडा उशीर होत होता कारण तो राऊल येऊन अर्धा तास झाला होता, पण ऑस्कर शांत होता. तिला म्हंटल माझी बहीण पण आर्टिस्ट आहे, किती खुश झाली दोन फोटो काढले आमच्या बरोबर.   निघताना परत काहीतरी बोलणं झालं त्यांच्या मध्ये, बहुतेक जास्त पिऊ नकोस ड्राइव्ह करायच आहे, मग तो पण नाही ग अस काहीतरी म्हणाला. आम्हाला म्हणते ह्याला कडेवर घेऊन फिरायचे मी सगळीकडे, मग परत दोघांनी मस्करी केली आणि आम्ही गेलो. पण ती परत त्या लोकल बार मध्ये बाय म्हणाली येऊन गेली, भावाच्याच शेजारी बसली, ती दोघंच गप्पा मारत होते आणि मग दहा मिनिटाने गेली. 

मलाही दोन मोठ्या बहिणी आहेत, म्हणून मला फार बर वाटलं, कारण  खंड बदलला तरी मोठी बहीण आणि लहान भाऊ ह्या नात्यात खंड नाही पडला . आज सगळे mothers day करत होते, दोन चार स्टॅंडर्ड मेसेज फिरत होते, स्वातीने , एक ओरीजिनल मेसेज पाठवला आणि अचानक मला वाटलं हो खरय,  मदर म्हणजे फक्त आईच का? जवळ जवळ सगळ्या नात्यात आई असतेच ना? पण बहीण हि आईच्या अगदी जवळ जाणारी असते आणि हा प्रसंग मला आठवला. 

शुक्रवार, १ मार्च, २०१९

कधीचनाही

कधी नाही पुन्हा कधीचनाही ssssss दे न ग एक पापा,  नाही कधीच नाही असं म्हणून चिमुरडी रुसते तेव्हा किती गोड वाटत .... पण कधीच नाही पुन्हा कधीच नाही , म्हणजे काय? ह्याचा खरा अर्थ आई गेली तेव्हा कळला.  एक दिवस हॉस्पिटलात होती तेव्हा ती बारी होणारच नाही हे कळून  चुकलं होत, तशीच ती गेली .... कधीच कधीच भेटणार नाही अशी .... तरी तेव्हा नाहीच कळलं , पण नंतर जाणवायला लागलं , पुनर जन्मात वगैरे मी फार नाही मानत, तरीही तेव्हा भेटेल वगैरे असं जरी मानलं तरी अशीच आई पुन्हा कधीच दिसणार नाही ... कधीच नाही 

आपण फार सहज पणे काही गोष्टी बोलून जातो , त्यातलीच ही एक पुन्हा कधीच नाही वाली. गेल्या पंधरवड्यात जे घडलय आणि त्यावर जो हलकल्लोळ माजलाय त्या वरून हे जाणवलं एवढच. ह्यात प्रेताच्या टाळू वरचे लोणी खाणारी माणसं दिसली, बेहेती गंगा में हात धोने वाले कळले, काही घेणं ना देणं, तरीही आपला विरोध नोंदवणारे, उगाच निषेध व्यक्त करणारे, एकदम भारत मातेचा पुळका आलेले, लगेच बंदूक घेऊन दहा माणसं मारायला निघालेले सगळेच दिसले. लोक काय वाट्टेल ते बोलले आगा ना पिच्छा, पण ते जे बोलले वागले हे त्यांना पुन्हा कधीच परत घेता येणार नाही कधीच नाही हे त्यांच्या लक्षात नसेल येत का?

मी फार काही भाष्य केले नाही आणि तेवढी माझी कुवत पण नाहीये , मी माझं तोंड बंद ठेऊन आहे, त्यामुळे सगळं बघता आलं ऐकता आलं. कुणाला मी काही समजवायला गेलो नाही कि समजून घ्यायला गेलो नाही. मला का कोण जाणे पण, हकनाक बापाचं छत्र हरवलेल्या त्या चिमुरड्यांचंच चित्र सारखं दिसत होत, जे ४५ सैनिक शाहिद झालीत, त्यांची मुलं.   म्हणजे अभिमान वगैरे वगैरे कळायचं वय सुद्धा नसेल काही लेकरांचे , त्यांना त्यांचा बाबा कधी ... कधी म्हणजे कधीच दिसणार नाहीये .... कधी नाही चा अर्थ पण त्यांना कळत नसेल. लोकांनी मदत सुद्धा केली, मी नाही केली अजून, काय मदत करावी हेच कळत नाहीये ... ज्यांनी केली त्यांचं कौतुकच वाटत , काही जणांनी त्यांच्या शिक्षणाची जवाबदारी घेतली, ते तर फारच स्तुत्य आहे... हेच असं प्रोतसाहन नेहमीच दयायला लागेल ... त्यांच्या वर अशी वेळ पुन्हा कधीच येऊ नये कधीच नाही.... 

युद्ध चालू आहे आणि सैनिक शाहिद झाले हे समजू शकतो (म्हणजे समजू नाहीच शकत ,पण कळू शक्त), हे वाटेत, बसल्या जागीच, एका क्षणात ह्या जगातून निघून जाईच .... असं .... कायमच ..कधीच कधीच परत न यायला ...? त्या मुळे आपण थोडं शांत राहावं असं वाटतं एव्हडेच , त्यांना घुसून मारलं हे वाचून बरं वाटलं न्हवे आनंदच झाला, हे आधीच केलं असत तर असं कधीच कधिच घडलं नसत ..हे पहिल्यांदा घडलंय त्या मुळे लोकही खुश झाली, अभिमान वाटला असच घुसून मारायला हवय म्हणजे आपले सैनिक असे फुकट मारले जाणार नाहीत ....  

पण जपून बोलूया वागूया कारण बोललेला शब्द आणि गेला माणूस पुन्हा कधी येत नाही कधिच नाही ... 

जय हिंद !