सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

पुन्हा झी चे कार्यक्रम

पुन्हा झी ....... 

गेल्या खेपेस जेव्हा मी रागाने, झी च्या (बौद्धिक ) घसरण बद्दल लिहिलं होत, तेव्हा वाटलं होत कि अजून किती खाली जाऊ शकतात ही लोक? चुकलो साफ चुकलो, आता रागा  ची जागा "कीव" ह्या भावनेनी घेतली आहे. आता कीव नक्की कुणाची करायची? झी ची? त्यांना भरपूर पैसे मिळतात, कलाकारांची? त्यांना ही पैसे मिळतातच कि, पण त्यांच्या creativity च काय? नुसते पैसे काय हो? अगदी..... कुणीही कमावत . का जनतेची? अगदी  तन,  मन, धन (झी फुकट नाहीये) लावून हे इतके फालतू , निर्बुध्द  आणि खूपदा घाणेरडे कार्यक्रम बघतात म्हणून. 

जय मल्हार : अजून शंभर वर्ष सहज जाईल ती मालिका, अहो देवचं आहे त्यात, त्यामुळे मालिकेला मरण नाही.   तरीही अजून त्या  मल्हर कम शंकर कम पहेलवाना ला अभिनय काही जमत नाहीये.  हळू हळू देवाला माणूस करून सोडणार आहेत कोठारे, मत्सर द्वेष ईर्षा अश्या माणसालाच दिलेल्या भावना देवात दाखवणार. माणसाला देव करणं सोप्प आहे पण  देवाला माणूस? ह्यात खरी creativity ..... 

तुझ्यात जीव  रंगला : खरं तर फार नाही पहिली ती मालिका, पण मला त्या पेहेलवाना  पेक्षा हा जास्त  आवडला. आणि  ती  भाषा पण शोभते त्याला , त्यात पण थोड vyamp पणा घेतलाय पण सध्या टी गरज आहे मराठी महिलांची (पुरुष नाही पाहत एवढ्या चवीने ह्या मालिका)  म्हणजे बघा मालवणी कट्टा नावाच्या हॉटेल मध्ये सुद्धा पनीर मसाला आणि फ्राईड राईस मिळतो ना तश्यातलं आहे, फार कुणी लावून घेत नसेल ही मालीका 

माझ्या नवऱ्याची बायको : बरा वाटायचा मला तो खांडकेकर , बरा म्हणजे बराच चांगला नाही. पण त्या दिवशी हवा येऊ द्या मध्ये तो आणि त्यांच्या सौ आल्या होत्या (ती आवडते मला, गोडे)  तेव्हा इतकी निर्बुद्ध उत्तर दिलीन तेव्हा माझी खात्री पटली  कि हा अगदी योग्य आहे त्या रोल ला. एक तर फार हावभाव करून अभिनय करण्यात त्याला रस नाहीये (RJ होता ना तो?). आणि फार काय नाही  त्यात त्याला करण्यासारखं.  अनिता दाते खरं तर गुणी कलाकार आहे, एकदा एका छोट्या भूमिकेत पहिला होत सुबोध भावे बरोबर,  मग एका लग्नाची दहावी बारावी गोष्टीत. ह्या रोल ला तशी फिट आहे, म्हणजे खूप देखणी बायको दाखवली तर तो एका कुरूप नटवीच्या प्रेमात पडताना दाखवलं तर कस वाटल असत ?  खर  काही हरकत नाही म्हणा,  इतका मूर्ख  पणा लोक खपवून घेतात हे पण खपल असत . लहान पाणी आम्ही challenge नावाचा खेळ खेळायचो त्यात चार एक्के असा दहावेळा तरी लोक करायचे, तस आहे समोरचा काहीच challenge  करत  नाही म्हंटल ना कि द्या थापा (ज्या दिवशी एका ने जरी challenge केला  ना कि बघा, झी च्या समोर तारे चमकतील ).  रोहिणी निनावे ह्या काकू अजून शे दोनशे वर्ष पूर्वीच्या काळात जगतात, म्हणजे अति टुकार मालिका असेल तर  लेखक कोण? हे कळायला फार वेळ लागत नाही. अजून चूल आणि मूल मध्ये गुन्तलेल्या आजी आहेत ह्या. शोभा कपूर एकता  कपूर हे त्यांचे idol असावेत, अजून माहेरच्या साडी मध्ये अडकलेल्या ह्या आज्जी ला झी का म्हणून इतक्या मालीका बिघडवायला देत असेल हे न सुटलेलं कोड आहे. नवऱ्याला डब्बा दिला म्हणजे सॉलिड आहे बाई, बस ह्या  पलीकडे ती  बाई विचार करू शकत नाही. मग ती दुसरी   मुलगी कशी वाईट? तर तिला स्वयंपाक येत नाही आणि काम पण नाही, मग का आवडेल त्याला? बर एक त्या माणसाला मुलं विषयी पण काहीच वाटत नाही? फारच जास्त  आहे हे, मग पोरखेळ  तोंडाला काळ फासा, खाज खुजली टाका असे अतिशय पांचट बिनडोक आणि बाळबोध गोष्टी दाखवून लोकांना हसवण्याचा (का फसवण्याचा?) नीच प्रयोग करणारी ही मालिका. कायद्याने बंदी आणता येईल का  ? हा विचार मी  अगदी मनापासून करतोय, पण वकील म्हणजे झी सारखीच जमात निघाली तर? माझेच पैसे जातील आणि ही जमात श्रीमंत होईल....... अरे हो एक राहीलच , हल्लीच्या हलली फडणवीसांचं भाषण बरेचदा ऐकल, बर बोलतात कि सारखं जाऊन राहील येऊन राहील वगैरे नाही करत ते, पण मग ती राधिका चांगली शिकली सवरलेली ही अशी भाषा का बर बोलते?  (इंग्रजी शिकवत नाहीत काय नागपूरला? )आणि तिला कणा नाही का? तोच उष्टा खरकटा नवराच तिला का हवाय? नागपूरचे लोक चिडत का नाहीत? विदर्भ ला अगदीच असं तस नका समजू एकदा का ते चिडून राहिले ना कि मग बघून राहा बे मुश्किल होऊन जाईल ..... 

ता क : अरुण नलावडे (खूप गुणी कलाकार)ह्यांनी लाजे खातर सोडली म्हणे सिरीयल 

खुलता  कळी खुलेना :   कोण म्हणतं जगात देव नाही? विक्रांतच एक देऊळ पण आहे म्हणे झी च्या स्टुडिओ मध्ये , रोज आरती वगैरे असते, बावन्न बुधवार केले आणि दररोज झी ला पन्नास रुपये दिले कि विक्रांत सारखाच नवरा मिळतो म्हणे (झी मराठी बंद पडणार हे गृहीत धरून नवीन धंदा काढलाय सुभाष जी ह्यांनी) गर्दी रोज वाढते आहे म्हणे. पण मला एकच खटकतंय, त्या मुलीला नाव द्यायचं ना स्वतःच, ती बायको गुणी आहे, क्रेडिट कार्ड दिल कि झालं फार फार तर अजून एक दोन चार लफडी करेल, पण ह्या वेळेस तो आधीच काळजी घेऊ शकेल (गायनेक असल्याचा काय उपयोग?). पण नक्की काय दाखवायचं आहे हे नाही कळलं मला, नाही कळत तेच बरं आहे तस,  मला  त्यांच्या इतका निर्बुद्ध पणा जमणं  कठीण आहे. ह्या सिरीयल मध्ये एक जमेची बाजू म्हणजे दिग्दर्शन आणि अभिनय, पण साला स्टोरी मधेच लोचा, खूप जास्त लोचा अजून किती खेचणार आहेत कुणास ठाऊक.  मी ही फक्त पहिले मिनिट भर सहन करू शकतो किंभहुना  आवर्जून पाहतो कारण त्याचा शीर्षक गीत,  शंभर पैकी दोनशे गुण ...... 

काही दिया परदेस : ही सीरिअल अजून पंन्नास वर्ष नक्की चालेल, फक्त तेव्हा सगळेच हिंदीत बोलतील, म्हणजे मुंबईत अशुद्ध हिंदी आणि बनारस ला शुद्ध, आधी मुंबई मग बनारस मग  परत मुंबई. इथे असलं तरी  आपल्या सारखच वागायचं तिथे पण असच  पण शिव ने इथे पण आपल्या सारखं आणि तिथे पण आणि मधेच एक वाईट सून (चायला हे काय काढलंय कळत  नाही, सून वाईट सासू वाईट). चांगला संसार चालला असेल तरी मोडतील ही लोक वाईट साईट मनात भरवून ..... जाऊदे . 

चूक भूल द्यावी घायवी : मी दिलीप प्रभावलकरचा fan आहे, मला प्रियदर्शन जाधव पण आवडतो त्या मुळे मी ती बघतो.   तरुण पणीची  पण मुलगी चांगली आहे, फक्त सगळीच लोक वयापेक्षा तरुण दिसतात ती म्हातारी  शंभर नाही वाटत आणि आवाज बघा कसला सात मजली लाऊड आहे पण फार्स म्हणून ठीके, अजून तरी हवा तसा विनोद नाहीये .  खरी कसरत जाधव ची आहे (जोशी नाही वाटत तो), त्याला अगदी प्रभावळकरान सारखच करायला लागत,आवाज वगैर चांगला धरलाय, लकबी पण, अभिनय उत्तम हलकी फुलकी मालिका अगदी आवर्जून पाहावी अशी हि नाही आणि पहिली तरी काहीच हरकत नाही.    

नकटीच्या लग्नाला यायचं हा :  काय सीरिअल आहे काहीच कळत नाहीये, नक्की काय म्हणायचं आहे त्यांना काय ठाऊक? उगीच पात्र वाढवून ठेवली आहेत मोठं मोठे कलाकार येतात आणि जातात ..... किती आचरट पणा? जाऊदे मरूदे . 

दिल दोस्ती दोबारा : जस्ट सुरुवात आहे,  पण मला ही आधी पण आवडायची म्हणजे तेव्हा पण टाकाउ न्हवती एवढी तरुण माणसं  असली कि एनर्जी येणारच आणि आता अद्वैत दादरकर आहे दिग्दर्शक, मी बघेन .  फक्त प्राईम टाइम द्यायला हवाय ह्यांना त्या रटाळ सिरीयल पेक्षा केव्हाही बरी ....

चला हवा येऊ द्या : दोन चार मालिकेचा लेखक विनोद आहे कुणीतरी, नावात आहे फक्त विनोद लेखणीत नाही, ते तरी बिचारे किती वेळ करणार हो कॉमेडी, थोडा ब्रेक घेऊन पुन्हा आलेत तरी चालेल.... जुन्या मालिका दाखव तोवर रिपीट     

मी आता न्यूस चॅनेल पाहण्याचा धाडस करणार आहे .... कारण मला त्याच्या वर लिहायचं आहे ...   

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

माणुसकी

दिनेश  गोहिल साहेब हे एक श्वान प्रेमी आहेत, आधी ते (पण) गावठी कुत्र्यांना घाबरायचे, त्यांच्या गल्लीत खूप होती, रात्री अंगावर वगैरे यायचे एकदम. मग वेग वेगळे विचार आले त्यांना संपवण्याचे. अचानक त्यांना वाटलं कि आपण root cause काय आहे हे पाहतच नाही, मग कोणत्या तरी  NGO ला पकडून सगळ्या कुत्र्यांचं operation करून, त्यांची संख्या कमी केली. आता त्यांच्याच घरात एका खोलीत सगळी कुत्री रात्री  झोपतात आणि हेच त्यांचा खाण पिणं आजारपण सगळ  बघतात. मी म्हंटल ग्रेट आहात सर. तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट  सांगितली 

तर हे राहतात मीरा रोड ला , आता खूप पसरलय आणि गाड्यांची वर्दळही वाढलीये .  पण कैक वर्षान पूर्वी विरार ला दर पंधरा ते वीस मिनिटाला एक गाडी होती , तेव्हा रात्री स्टेशन वर वर्दळ पण कमी असायची. एकदा ते दहिसर ला गाडी साठी थांबले होते, साधारण दहा साडे दहा झाले असतील, पावसाळा होता, सगळे प्राणी माणस  गुडूप आडोश्याला बसली होती. तिथे एक म्हातारी आणि म्हातारा होते तिथेच राहत असतील, म्हातारीने एक पिशवी काढली त्यात काही जेवण वगैरे होत, तिने एक थाळी काढली आणि एक हाक दिली, तस एक कुत्र  आल पिशवीतलं थोडं त्याला  दिल  , त्याने खाल्यावर तेच ताट पावसाच्या खाली धून म्हाताऱ्याला दिल , मग तेच स्वछ करून आपण त्यात खाल्लं . तिथेच एक चादर ओढली आणि निजली ते कुत्र पण तिथेच वळकोटी करून झोपलं .

म्हणजे खायची  भ्रांत डोक्यावर छप्पर नाही, तरी माया केवढी आणि ती पण एका भटक्या कुत्र्यावर?   ते म्हणाले  मी अवाक होऊन बघत राहिलो.  त्यातूनच प्रेरणा घेतली असेल म्हणाले. 

पण गोहिल साहेब ग्रेट आहेत .... त्यांची स्टोरी पुन्हा कधीतरी