शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

हिंदी मिडीयम

हल्ली त्या RTE  मुळे सगळ्याच शाळान मध्ये सगळीच मुलं admission  घेऊ शकतात म्हणे , म्हणजे फक्त उचभ्रू नाही तर साधी जनता पण.  काही तरी सूट सेल म्हणा. सांगण्याच तात्पर्य तुमच्या मुलाच्या वर्गात तुमच्या काम वालीची मुलगी असू शकते , तो "हिंदी मिडीयम"  नावाचा पिक्चर येऊन गेला ना ? तस .
  
तर त्यात काही लोक घाबरली , आमच्या मुलाच्या किव्हा मुलीच्या शेजारी ही अशी  लोक? आईला म्हणजे? अशी लोक? त्यात लहान मुलांचा काय दोष? खर तर खूप बर होईल , त्या मुलांना पण खूप चांगल  बघायला शिकायला मिळेल, त्यांच्या कडून आपल्या मुलांना कष्ट, पैश्याच महत्व वगैरे कळेल, काही मुलांना माहित असेलच आणि चूक पालकांची पण आहे , मागितलं कि आणून देणं हे मी पण करतो म्हणा, त्या मुलानं कडे बघून हे तरी कळेल.

पण एक होऊ शकत त्या मुलांना complex नको यायला, हल्ली काय लहान मुलं   डब्यात सफरचंदा  ऐवजी खिश्यात Apple घेऊन फिरतात. 

आमच्या लहान पाणी हे एक बर होत, आमच्या   शाळेत सगळी मुलं यायची  आणि खाली  खेळायला गेलो कि बाजूच्या चाळीतली पण असायची, तेव्हा झोपडपट्या न्हाव्त्या (आता काय म्हणा चांगल्या घरात पण ते कल्चर आलंय), नुसत्या चाळी होत्या, काही अगदी वाईट होत्या  म्हणा , पण आम्ही सगळ्यांशी खेळायचो. आमच्या घरा  जवळ बन्सी चाळ होती, अजून आहे , त्यातली पोर  जरा डेडली  होती,  म्हणजे मारामारी, वाह्यात पणा वगैरे , त्यात हुशार माणस पण होती , पण जास्त करून डेडली.  तेही आमचे मित्र होते.  झालच तर  काजू पाडा भाटिया चाळ, कार्टर रोड नंबर  ३ ची मुलं , ही सगळीच. आता कधी तरी ओळखीचं भेटतात, काही बदलली असतात काही तशीच.  

तसा एकदा  मला अँड्रीव भेटला होता, तो मला शाळे पासून ओळखायचा, म्हणजे मी शाळेत जायचो तेव्हा, तो कधी गेला असेल अस वाटत नाही.   मी आणि माझा आत्ते  भाऊ मनोज दादा पान आणायला गेलो होतो, नवमी का दसरा असेल, आत्या आली होती ,  जेवण झाल्यावर आम्ही गेलो पान  आणायला. हे ही खूप वर्षान  पूर्वी, माझ कॉलेज नुकतच  झालं होत, दत्त पाडा फाटक तसच होत , फ्लाय ओव्हर न्हवता झाला तेव्हाची गोष्ट.     पानाच्या गादीवर अँड्रीव, मला अगदी प्रेमाने भेटला, त्याला थोडं होत माझ्या बद्दल .  एकदा दोनदा खाऊन गेला होता घरी,  तो का आला होता तेही आठवत नाही, तस माझ्या आईने कुणाकुणाला जेवायला घातलाय म्हणून सांगू? मी बरेचदा मित्रांना घेऊन यायचो, ती काहीही ना  बोलता खायला घालायची, अन्नपूर्णाच होती म्हणा,  आता नवल वाटत  कारण तरुण  मूल  नीट खातात , तेव्हा कळायचं नाही किती  असेल घरी वगैरे ,  आता अचानक पणे  लोक येणे आणि खायला घालणे ही पद्धत सम्पलीच आहे . 

तर अस अनेक जणांन पैकी हा एक होता , त्या मुळे   आई बद्दल आदर म्हणा कि माझ्या बद्दल आस्था म्हणा, तो नीट प्रेमाने बोलायचा,  कारण  त्याला  घरी नेऊन खायला कुणी घातल असेल  अस  वाटत नाही मला.  एरवी शेर असणारा हा अगदी भीगी बिल्ली झाला होता घरात,  अगदी हळु खाल्लं आणि परत काहीही मागितलं नाही , ताट कुठे धू म्हणाला :), एकदम भारावला होता , भरल घर कधी न  पाहिलेला, असं आई खायला देतेय छान टेबल खुर्च्या नळाला पाणी, त्याला खूप भरून आल्या सारखं वाटलं मला तेव्हा, मला कळलं नाही असं काय करतोय हा? कारण मला हे अगदी नॉर्मल होत हे त्याला स्वप्न वाटत होत.  तर  हा अँड्रीव आम्हाला पानाच्या गादीवर भेटला पांढरे कपडे हातात, गळ्यात सोन, मनोज दादा कडे बघून अपना भाई क्या? अस म्हणाला, (अपना)?  मी जमेल तेवढं  त्याच्या धंद्याच सोडून इतर गोष्टीन बद्दल चर्चा करत होतो, तेवढ्यात त्यानेच आगाऊ सारखं भाई किधर रेहताय असा विचारलं , ठाणा म्हणाला मनोज दादा , आता मी पुढच्या गोष्टी साठी मनाची तयारी करत होतो कारण मला पुढे काय संभाषण होणार ते माहित होत, अँड्रीव लगेच अरे ठाणा  में किधर? आत्या कुठे राहते ते  सांगून झाल, मे भी था म्हणाला ठाणा  में , तरी मी त्याला म्हंटलं चल निकलते है हं लोग, पण मनोज दादा ला कस कळणार बिचाऱ्याला , विचारल त्याने  , किधर था ठाणा  में? ठाणा जेल में  हाप  मर्डर किया ना , साला बच गया ,  ज्यादा नई  दो साल था , अभि जमानत पे  भार है, छूट जायेगा,   अब ओह सब नई करताय , कभी आयेगा तो मिलेगा   आपको .  कूच लगेगा तो  बोलना   सागर   को,  एकदम खास है अपना, तू बोला नई क्या भाई को अपने बारे  मे? त्याच्या पांढऱ्या शर्ट खाली त्या रामपुरी चा दांडा मला स्पष्ट दिसत होता तो काय माझ्या थोरल्या भावाच्या नजरेतून सुटणारे? ...... घरी येई पर्यंत मनोज दादा एक शब्द  न्हवता बोलला  ...  

तर सांगायचा अस कि आपण स्वतः स्वतःला एका कोशात किव्हा पिंजऱ्यात बंद करतो आणि तो आणखी खुजा करत जातोय, पालकांचं म्हणणं कि आम्हाला आमच्या सारखीच मुलं हवीत वर्गात तर मुलांची वाढ खुंटणार ते कोशातच राहणार  त्यांचा, हे जग बघा  किव्हा आपला भारत देश हा किती विविध लोकांनी भरलाय, इतकी वर्ष  सगळे आप आपल्या  कोशात होते अजून  काही राज्य अशी आहेत जी आपली भाषा सोडत नाहीत, किव्हा IPL बघा, एका टीम मध्ये किती विविध प्रकारची खेळाडू असतात, त्याने किती फरक पडतो बघा, भारताच्या खेळाडूंचा आता रेकॉर्ड बघा IPL नंतर किती सुधारलाय . कारण विविधता , ती हवीच ना. किती नुकसान करणार आपण आपल्याच मुलांचे?    

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

गैर समज

गैर समज ही मोठी चमत्कारिक गोष्ट आहे , आपण केली तर समोरचा येडा , आपल्या बद्दल झाली कि आपण शहाणेच होतो पण मूर्ख लोक असतात जगात .... 

आमचा धनंजय अजिबात पुणेरी वाटत नाही, जन्म सदाशिव पेठ सगळं शिक्षण, बायको, नोकरी  सगळं पुण्यात   (नाही म्हणायला थोडा काळ  मुंबईत नोकरी साठी राहायचा म्हणा), पण गडी  अजिबात पुणेरी नाही, एकदम गोड आहे , हसतो सात माजली  स्वतः वर केलेल्या विनोदावर सुद्धा, आता बोला? बिल भरायला भांडतो आणि मित्रान वर आनंदाने  खर्च करतो, खाण्यात (फक्त ) शाकाहारी आहे  , पण माणूस म्हणून मस्त , कधी कुस्क बोलत नाही कुणाला हिणवत नाही टोचून तर अजिबात नाही आगाऊ नाही आणि रंग सुद्धा देशस्थी , सगळ्यांना आवडतो ऑफिसात पण (घरी माहित नाही :)) , आता ह्याला पाहिलं तर पुणेकरांना बद्दल लोकांचा गैर समज  नाही का होणार?  का पुणेकरांना बद्द्दल लोकांचा गैर समज आहे ....... 

निगडी ला एक पेपर वाला  आहे पन्नास एक वर्षांचा असेल.  सकाळी एके ठिकाणी  पेपर घेऊन बसतो आणि वाटतो पण, हसराय (पूर्वीच पूण नाही राहील आता ), तो पेपर वाटायला गेला कि त्याचे वडील बसतात तिथे , ते ठार भहिरे  आहेत ,  आधी मला कळलंच नाही ते बहिरे आहेत ते, मी एक इंग्रजी आणि एक मराठी पेपर मागितला तर त्यांनी मला नवाकाळ आणि एक मद्रासी पेपर दिला (काय कॉम्बिनेशन तर बघा), मला वाटलं बाजूला कुणाचं असेल , तर ती लोक माझ्या कडे पुणेरी माणसालाच शोभेल अश्या नजरेने पाहू लागली, मग मला कळलं  कि त्या माणसाने, माझ्यासाठीच  हा पेपर काढलाय .... एक दोनदा  असच  झाला , मग त्यांचा तो मुलगा (टक्कल पडलंय खर  तर ), पुढे आला आणि  मला पटकन दिले पेपर, मग माझ्या लक्षात आलं कि ते काका बहिरे आहेत .  पुण्यात असलो कि त्याचाच कडून पेपर घेतो तरी त्यांना मी काय घेतो हे माहित नाही अगदी अचूक पणे चुकीचे पेपर मला देतात ,  आता मी त्याला बोटाने दाखवतो कोणता पेपर (तरी चुकीचाच पेपर काढतात म्हणा निम्म्या वेळा) मग ते पण खाणा  खुणा करतात  आणि सांगतात किती पैसे द्यायचे ते, कारणत्यांचा असा गैसमज झालाय कि मी बहिरा आहे ....  आता बोला ...  

आमच्या आधी ऑफिस मधून काही ट्रेनिंग्स होत होते , अजून बाकीच्या ऑफिसात होत असतील आमच्या इथे बंद झाले . तर त्या ट्रेनिंग्स नंतर दोन दिवस फार छान वाटतं ,  म्हणजे आपण किती छान, आयुष्य जगू शकतो लोक कशी छान असतात जग काय सुंदर आहे आपण काम कस करायला हवय , पैश्यात कस   सुख नसतं वगैरे वगैरे , बरं वाटत दोन दिवस मग .... ये रे माझ्या मागल्या ... अश्याच एका ट्रेनिंग मध्ये माझा एक मित्र जाऊन आला , तो पण असा  भारावून गेला होता , पहिलं वहील असावा ट्रेनिंग त्याच , दोन चार दिवसाने म्हणतो चायला काय पण सांगतो तो ट्रेनिंग  वाला.  का माझी गर्ल फ्रेंड पागल आहे ते कळत  नाहीये? मी म्हंटल का रे? काय झालं? ह्याने त्या ट्रेनिंग वाल्या काकांना ह्याच्या गर्ल फ्रेंड शी का भेट घालून दिली असेल? तो म्हणाला कि अरे त्या दिवशी मी त्या कसल्या तरी ट्रेनिंग ला गेलो होतो.  ट्रेनिंग मध्ये सांगितलं कि आपण कस आवडीच्या लोकांना आपल प्रेम व्यक्त करत नाही, थँक्स म्हणत नाही , अस केलं कि लोक कशी खुश होतात एकदम पोस्टिव्ह वाटत .... मग लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या गर्ल फ्रेंड ला फोन लावला आणि म्हणालो कि तू मला खूप आवडतेस किती चांगली आहेस,  हुशार आहेस , नोकरी करतेस , समजा सेवा , माझी काळजी घेतेस... तशी ती लगेच थांब , थांब , म्हणाली,  मी तुला सांगितलंय कि लग्ना आधी काही नाही आता साखर पुडा पण नाही झालाय. नक्की लग्न करणार ना? आधीच सांग  आणि सकाळी प्यायला का रात्रीची पार्टी आत्ता संपली? काही दूसरा विचार करत नाहीस का रे तू?मला सकाळी खूप काम असतात , सकाळी काय आहे चावट पणा?..... तास भर बोलली  (तेव्हा बारा वेळ मिळाला), काय काय म्हणून बोलली  भलतच झाला ,तरी  नशीब , मी आईलाच सांगणार होतो आधी ती स्वयंपाक करताना कि किती छान करतेस स्वयंपाक , बाबांची काळजी मला नीट वाढवलास , मेलोच असतो, हातात लाटणं होत  तिच्या , अजून धपाटा घालते पाठीत, तिला जर वाटलं असत कि मी सकाळी चोरून दारुण प्यायलोय तर हाणलंच असत .... बायका उगाच गैर  समज  करतात आणि सेम टू सेम . मी पडून पडून हसलो .....  काय करायचा बोला?

आता तुम्ही बघा आपण जेव्हा कुणाला निवडून देतो  ते पण गैर समजा मुळेच, कधी तो टिकतो कधी नाही, लग्न पण तसेच करतो,  अंधश्रद्धा म्हणजे पण गैर समजच कि हो आपण हजारो वर्ष त्या गैर समजा वर  आहोत तर  विश्वास निर्माण करण्या पेक्षा माझ म्हणणंय कि गैर  समज  करून द्या खरा असला तरी, लोकांना पटत ..... 

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

अजित रानडे

परवा  मी अजित रानडे ह्यांची ट्विटर वर खिल्ली उडवली (प्रयत्न केला). वास्तविक मला त्यांच्या बद्दल नितांत आदर आहे, मुंबई मिरर मध्ये अतिशय सुंदर स्तंभ ते लिहितात . 

त्या आधी त्यांची थोडी माहिती.  रानडे हे IIT मुंबई आणि IIM  अहमदाबाद मधून शिकले आहेत आणि मग त्यांनी PHD सुद्धा केली आहे ते पण ब्राउन विद्यापीठातून , खूप हुशार economists आहेत. म्हणून अगदी सोप्या भाषेत ते लिहितात , म्हणजे आपल्याला कळेल असं ते समजावून सांगतात आणि ते आपल्याला कळत. मी जेव्हा ट्विटर वर आलो तेव्हा मी त्यांना शोधून follow केलं . खूप गुणी माणूस अफाट वाचन असणारच आणि ते चांगलं चुंगलं शेर करतात (नाही  म्हणायला सरदेसाई नावाच्या इसमाला पण करतात, पण ते ठीके)  . 

तर त्या दिवशी त्यांनी कन्हैया कुमार ला लेखक म्हंटल आणि त्याची गळचेपी कशी केली ते लिहिलं आणि काही तरी retweet केलं . आता बरखा राणी ने केलं असत शेर तर मी दुर्लक्ष केलं असतं (मी तिला नाही करत follow), पण रानडे? मला खूप राग  आला, आवडतात रानडे मला ते अस कस करू शकतात? मग  मी  खिल्ली उडवल्या सारखं   केलं तर त्यांनी मग (फक्त )त्या कन्हैया च एक पुस्तक छापून  आलय  ते शेर केलं, अरे!  हॅरिस शिल्ड मध्ये कुणी एक century ठोकली म्हणून त्याला तुम्ही उत्तम  batsman म्हणून लगेच कोच म्हणून नेमत नाहीत आणि नाही नेमले म्हणून लोकांना दोषी धरत नाहीत. 

तर हा  जून होऊ घातलेला लोकांच्या पैश्यान वर फुकट JNU मध्ये राहून काश्मीर आझाद करो आणि भारत तेरे तुकडे होंगे म्हणून नंगा नाच  करणारा माणूस,  लेखक कसा होईल  एका पुस्तकाच्या जोरावर? माझं पण एक पुस्तक छापून आल आहे म्हणून काय मी लगेच परिषदेला भाषण  ठोकू?   एक तर  तो नोकरदार माणूस आहे पगारावर काम करणारा कारण एरवी गरीब म्हणून घेणारा  माणूस मुंबई पुणे विमानाने फिरतो ? (रानडे पण  गाडीने जात असतील पुण्याला ). ते काय स्वतःच्या पैश्यां  वर? नाही ,  ते communists पक्षाच्या जोरावर आणि ते पुस्तक कश्या वरून ह्याने लिहिलंय? लेखक आहेस ना? मग सोड ना  फुकटे पणा , तिथून (JNU मधून) काय पेन्शन घेऊन निघणार?

तर  मला रानडेंचा  विरोध नाही राग तर त्याहून नाही , पण ते जो विचार promote  करतात त्याचा आहे. लोक त्यांचा आदर करतात (मी पण ), भेटले कधी तर नामकर सुद्धा करेन (वाकून ).  कन्हैया म्हणेज काय कुणी मोठा होतकरू मुलगा नाही, भाड्याचा टटू  आहे त्याची दया वगैरे करण्याच्या लायकीचा तर अजिबात नाही म्हणून  खवळलो मी त्याला गरीब बिचारा केला म्हणून . 

आता मी काय उजवा नाही, म्हणजे विचारांनी, (थोडा झुकलो असेन ) डावा तर अशक्य , एक वेळ राहुल गांधी हुशारीने बोलेल पण मी डावा होणे अशक्य, आताच्या जगात मूर्ख पणा आहे, त्या चे गुव्हेराच्या वेळेस असेल ग्लॅमर पण आता नाही . जग बदललं आहे बदला आता आणि मुंबई ते पुणे विमानाने जाऊन कसले communist?

तर डॉक्टर रानडे चूक भूल माफी, राग तुमच्यावर नाहीये , तुमचे विचार पण छान असतात, तुम्ही लिहिलेले अर्थ शास्त्राचे तर मला  कळतात पण , ह्या लुच्च्या लोकांचा तुम्हाला पुळका आला कि मला राग येतो, मी काय तुमच्या एवढा सुशिक्षित नाही कि विचारवंत नाही, बुद्धी जीवी तर अजिबात नाही पण कधी तरी राग येऊ शकतो ना? माझ्या देशप्रेमाच्या कल्पना पण इतर लोकान सारख्या नाहीत, कुणी राष्ट्र गीताला उभा नाही राहिला  तरी मी त्याला मारणार नाही पण , कुणी रस्त्यात थुकला तर मात्र मी नक्की हटकेन ..... पण तरी कन्हैया? माफ करा  पण तुम्ही केला तो ट्विट म्हणून बोललो, श्रद्धा स्थान आहात माझं ते हल्ल कि त्रास होतो.  

रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

निर्बुद्ध

एक अतिशय निर्बुद्ध आणि संताप जनक मेसेज सध्या येतोय तो म्हणजे ब्रिज पडला बुलेट ट्रेन बंद करा , त्यांना सांगा आधी ब्रिज बांधावा म्हणाव, हीच लोक असं हि म्हणाली "कशाला हवा काम्पुटर ?" आणि मग स्वतः आरामात तेच  काम्पुटर शिकून फारेनला जाऊन बसली विदेशी पासपोर्ट घेऊन . तुम्ही जर विदेशी पासपोर्ट धारक आहात तर तुम्ही मुळात भारतीय नाही राहिलात मग तुम्हाला अजिबात हक्क नाहीये तुम्ही तुमच्या देशाबद्दल बोला. लोक जी मेसेज पाठवतायेत त्याच लोकान पैकी आहेत ज्यांनी पूल पडला पळा पळा केलं .  नुसता मास हिस्टेरिया , पण हे सुशीक्षीत लोकान कडून यावं? आता सुशिक्षित आणि सुसंस्कृत ह्या मध्ये फरक आहे म्हणा, जसे मोदींवर आंधळं प्रेम करणारे लोक आहेत तशीच आंधळा द्वेष करणारी पण आहेत, (पण त्यांच आंधळं प्रेम लल्लू वर आहे किव्हा पप्पू वर हे नक्की  ) हा  आंधळा द्वेष मोदी नसून कधीकधी देशावर सुद्धा होतो हे लक्षात सुद्धा येत नाही.  स्वतः  ग्रीन कार्ड किव्हा युरोपचा पासपोर्ट  , पॅरिस ते लंडन  थाळीस (बुलेट ट्रेन) मधून प्रवास केला आणि कस इंडिया मध्ये हे होऊच शकत नाही हे सल्ले देणारी  माणसं आता बुलेट ट्रेन ला विरोध करायला लागलेत ...... ही सगळी अती हुशार माणस , अक्कल मात्र नाही , मराठी पणाचा खोटा अभिमान सावरकरांना नाव ठेवलीत कि चालतं (आवडतं ) आणि एक मराठा साठी पाठिंबा, स्वतःच्या  पोरांना मात्र इंग्रजीत बोलायचं हा हट्ट . 

आमच्या एरिया मध्ये एका पानाच्या दुकाना बाहेर एक माणूस रोज पान खातो  आणि तिथेच थुंकतो आणि म्हणतो  बुला मोदी को साफ करनेको , काही लोक हसतात  आणि बरोबर आहे म्हणतात साला मेरे को बोलताय स्वछ भारत नाही  करताय जा भाडं में , तो त्याच बिल्डिंग मध्ये  वर राहतो , म्हणजे रोग झालाच थुंकण्या मुळे तर त्यालाच किव्हा त्याच बिल्डिंगच्या लोकांना होणार.  अशी   लोक आहेत जे मुदाम चाइनीस वस्तू घेतात साला मेड इन इंडिया काय? बंद करेगा सब ....  

तोच  ब्रिज काय? असे अनेक आहेत , कित्त्येक वर्ष तसेच आहेत, अतिशय वाईट झालय पण हे अस  होणार नाही ह्याची  आपणच नको घ्यायला ? बेशिस्ती खूप वाढलीये आणि मास हिस्टेरिया त्या मेसेज सारखा, रस्त्यात सगळ्यांना आधी पुढे जायचं  असत. त्या दिवशी ते स्पाईस जेट च विमान थोडं विमान पट्टीच्या पुढे गेलं तर आतल्या एका माणसाने लिहिलं होत कि काही पुरुष,, लहान मूल, बायका , म्हातारी माणस ह्यांना ढकलून पुढे गेले , बस मध्ये धावत जाऊन बसले आणि लहान मूल पावसात कुडकुडत उभी , हीच लोक बुलेट ट्रेन नको बंद करा चे मेसेज पाठवतात , अक्कल नाही स्वतःची , नुसता मोदी द्वेष. स्वतः काय करताय?    ब्रिज गिरगाया म्ह्णून बोंबा मारायच्या आणि स्वतः लोकांना ढकलून चिरडून पुढे. 

एक तर जापान तुम्हाला साधे पूल बांधायला पैसे देत नाहीये आणि कर्ज पण माफक दरात, होऊ दे कि चांगली गोष्ट प्रॉब्लेम काय आहे? माझा जन्म मुंबईचा (पासपोर्ट पण भारताचाच आहे अजून तरी ) ट्रेन च्या प्रवासाची सवय, जवळ पास वीस वर्ष ट्रेनेच प्रवास केलाय सध्या ऑफिस ते घर हा प्रवास रस्त्याने जवळ पडतो म्हणून स्कुटर . सांगायचं मुद्दा असा कि मी ट्रेनने प्रवास केलाय आणि तो आत्ता किती घातक  आहे हे सांगू शकतो . घटक असल्याचं मुख्य कारण म्हणजे बेशिस्त , त्या साठी तुम्ही काय कराल? पुण्यात तुम्ही हेल्मेट पण नाही म्हणता घालणार आणि गप्पा कसल्या करता इंग्लंडच्या? आणि कसंय ना? एकदा सरकारवर ढकलले की बास आपण मोकळे. एका मुर्खाने तर मला, शिवसेनेने  कस  पत्र पाठवलं होत? ते पाठवलं. अरे तुम्ही सरकार मध्ये आहात दोन्हीकडे , परळ दादर एरिया तुमचा आहे , एक हि वीट   बंधू देणार नाही ही अक्कल आधी न्हवती का?
का वाट   पाहत होतात? शाईन मारायची? ब्रिज बांधला असता   तर नुसत एक पोश्टर लावलं असत "सदर पुलाच काम  अमुक  अमुक ने केलं " काय उपयोग? आता बघा सगळी मीडिया येईल आणि आता तर बुलेट ट्रेन चा विरोध म्हणजे सगळे वीरोशी पक्ष वाले एकत्र येणार .... 

आपणच एक पण   करूया कि ह्या पुढे ब्रिज पडला अस व्हाट्सअप वर पण नाही करायच, अक्कल  दिली असेल देवाने तर ती वापरून मेसेज वाचूनच पुढे करा ... खूप फरक पडेल फक्त ह्या करता तुम्ही लॉजिक वापरलं पाहिजे आणि भारतीय नागरिक हवात (नुसतं राष्ट्र गीताला उभं राहील म्हणजे देश भक्ती नसते राव ), झालंच तर ज्याच्या कडून हा मेसेज येईल त्याला परत पाठवून उलट तपासणी करा ... पुढे आणि दुसऱ्यावर ढकलण्या पेक्षा एकदा पाठी वळून पहा ....  

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७

गणपती बाप्पा ....मोरया

हल्ली रस्त्यात गणपती बाप्पाचे चे पंडाल आणि नेत्यांचे आणि बऱ्याच ऐऱ्या गैऱ्याचे पोस्टर्स लागले आहेत, सगळयात डोक्यात जात ते म्हणजे तिवारी, पांडे , शुक्ला , यादव , सिंग  हे हात जोडून पोस्टर्स वर माझ्याच मुंबईत माझ्याच बाप्पाच्या घरात  माझच स्वागत  करत उभे.... अरे तू कोण माझं स्वागत करणारा? एक तर  बाप्पा ला "बप्पा" म्हणतात तो एक राग आहेच. उद्या माझ्याच  घरी खालचा  watchman  "आओ आओ आपका  घर मे स्वागत है" म्हणेल ....  रस्ता घेतला, रिक्षा घेतल्या  फूटपाथ  तर त्यांच्या मालकीचा आहे असा वटहुकूम सेनापती ह्यांनेच काढलाय अस एकूण दिसतय,  आता माझा देव बाप्पा  पण? नाही म्हणायला सावंत -चव्हाण -कदम - राणे ह्यांचे सह कुटुंब,  सार्वजनिक गणपतीला आमंत्रण देणारे काही फलक त्या गर्दीत दाटीवाटीने उभे आहेत, पण ते दहा वर्षात जातील ...उद्या धोतर सोडून लुंगीत नका रे आणू गणपतीला तो काय त्याच्या वडीलां सारखा नाहीये गुळाचा म्हणून राहील ..... मुंबईला खड्यात घातली आहेच  किमान आपल्या विघनहरत्याला तरी सरळ रस्त्याने जाऊद्या ...... 

सोमवार, ७ ऑगस्ट, २०१७

निगडीतली देवळ

वणी च सप्तशृंगीच देऊळ सोडल्यास मी फार आवडीने देवळात जात नाही , नेलं तर ना नसते , पण मुद्दामून जात नाही, मी शॉपिंग मॉल ला पण आवडीने जात नाही. मला सगळ्याच गोष्टींचा धंदा केलेला आवडत नाही. दत्तपाड्याला आम्ही जिथे राहायचो तिथे एक रामाचं देऊळ होत, खूप मस्त मला जाम आवडायचं, आम्ही पावसाळयात तिथे आत खेळायचो , राम  नवमी   सोडल्यास फार गर्दी नसायची आणि तिथे कीर्तन व्ह्याच, तेव्हा ते अकराला बंद होयच, नुसतं टाळ आणि ढोलक, माईक नाही कि काही नाही खूप प्रसन्न वाटायचं. तेव्हा सुद्धा कुणीतरी तक्रार केली होती आवाज होतो म्हणून. चालायचंच, इलाज नाही, नाव घेत नाही त्या माणसाचं, पण देव धर्म वगैरे करणारा माणूस होता . सांगायचा मुद्दा असा कि मला देवाचा प्रॉब्लेम नाही , मला त्याला विकणाऱ्यांचा आहे , म्हणून मी मोठी देवळ  टाळतो , जमलंच तर मुख दर्शन. 

मी सध्या निगडीला असतो , प्राधिकरण , मुंबईच्या गजबजाटा पासून दूर , शांत जागा  आहे . सगळ आटोपशीर तरी सगळं मिळत आणि फार लांब जाव लागत नाही , मॉल नाहीत अजून इथे, ज्यांना ते आवडत त्यांना इथे नाही आवडणार.   माझ्या पायाला भिंगरी आहे, त्या मुले मी सतत इथे चक्कर मारत असतो. खूप देवळ  आहेत इथे सुंदर आहेत, पण एरवी मी पायात shoes घालून असतो म्हणून  आत जाता न्हवत  आला, पाऊस होता त्यामुळे स्लीपर घालणं पण कठीण होत , पण काल संध्याकाळी मी आमच्या समोरच असलेल्या  स्वामी समर्थांच्या देवळात गेलो , बाजूला गणपतीच छोटं देऊळ आहे, मला गणपती आवडतो मस्त असतो नेहमी. देऊळ शांत आहे छान तसाच मोठा ओटा स्वामींची मूर्ती एक चार पायऱ्या वर गाभारा आहे तिथेय, गाभाऱ्यात AC वगैरे आहे, तो नक्की कुणा करताय ते ठाऊक नाही, पण देऊळ प्रसन्न आहे बाजूला बाग आहे , खर म्हणजे एक सोसायटी आहे तिची बाग आहे , मस्त आहे हिरवी गार. एक पाच मिंट बसून मी निघालो. बाहेर टाकी आहे पाण्याची एक कुत्र होता बसलेलं , देऊळ साफ करणारी बाई कडे बघून जोरात शेपूट हलवायला लागला, त्या बाईने टाकीचा नाळ उघडून दिला आणि त्या  कुत्र्याने मस्त तोंड खाली धरून पाणी प्यायला सुरुवात केली , बाई पण त्याला काही तरी बोलली कानडीत ....

मला आठवलं कि पाठी एक मारुती मंदिर आहे दक्षिण मुखी असं आहे, मला फार सोयर सुतक नाही देवा ने कुठे पण बघाव ,पण असले काही तरी. अतिशय सुंदर असा परिसर आहे, मोठी बाग आत गोल गोल असे पायवाटा, स्वच्छ कुठे घाण नाही  कुणी जबरदस्ती करून हातात हार देत नाही, फुलं कोंबत नाही , पेढे नाही , नारळ नाही काही नाही . गेटच्या आत गेलं कि उजवीकडे  बाप्पा च देऊळ आहे, मस्त आहे आवार छोटा आहे , बाहेर दोन आज्या आणि एक आजोबा होते , त्याच गप्पा, त्यातली एक आजी बहिरी होती त्या मुळे मला आणि खूप लोकांना सगळं  ऐकू येत होत. गणपती पूर्व पश्चिम होता. त्या देवळाच्या थोड्या पुढे मारुती मंदिर , छान छोटे खानी  रस्ता बाग, सहाच उन्ह , पाठी लहान मुलांचा प्ले एरिया , मोठी मूल (मुलीचं होत्या जास्त )  मस्त त्या बागेतून बागडत होती (अनवाणी ).  मेन गेट पासून देऊळ पन्नास फुटांवर आहे मध्ये बाग हिरवीगार , आजूबाजूला छोटीशी घर आणि झाड , त्यातून हलके सूर्य किरण येत होती आणि संध्याकाळचा एक छान सुवास. हे देऊळ थोडं मोठय , म्हणजे बरंच , एक वीस बावीस पावलांचा तो ओटा मग गाभारा, देवळा  सारख देऊळ , पण हल्ली देवळा सारख देऊळ दिसत कुठे? छान आहे कोरीव मूर्ती, पण आमच्या इथे बोरिवलीला एका हातात मोठा डोंगर   आणि दुसऱ्या हातात गदा असलेली शेंदूर फसलेली साईड पोझ वाली मूर्ती आहे त्या मुळे असा रेखीव हनुमान मी पहिल्यांदाच पहिला , मी फार देवळात जात नाही त्या मुळे  हनुमान असाच असतो अस मला वाटायच एकदम उडणाऱ्या पोझ मध्ये, सगळी देवळ एक तर दत्तपाड्याची लहान पणा पासून पाहिलेली किव्हा वणी तेच ठाऊक आहे मला . 

मी देवळात गेलो त्या चार पायऱ्या चढून, रीतसर नमस्कार केला आणि बाजूला माझ्या माहितीतला हनुमान दिसला त्याला मी थोडा जास्त वेळ नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली, खूप सुबक देऊळ केलय हे प्रदक्षिणा मारताना दिसलं . तसाच पाठी येत मी  अगदी पायरी जवळ भिंतीला टेकून बसलो, डोळे बंद केले खूप शांतता , मधेच मुलांचा आवाज खेळताना , देवळात मुलांचा आवाज खूप छान वाटतो तसाच डोले बंद करून बसलो तेव्हड्यात हलके घंटा वाजली मोठा आवाज नाही छोटा ....टन  टन असा ....एक दोन मिनिटाने बाजूला डोळे  उघडून पहिल तर एक माणूस होता बाजूला, मला हात जोडून नमस्कार केला मी हि केला , मग गुरुदेव दत्त म्हणाला, मला पण म्हणा असा आदेश सोडला , मी हि म्हणालो. मग बोलायला लागला , जरा वेडसर टाईप्स होता , मग देवाला माणूस करून तो कसा मोठाय ते सांगत्याला लागला ,परत गुरुदेव दत्त म्हणाला , मी पण लागलीच म्हणालो .   आपण अश्या लोकांशी वाद घालत नाही , नशिबाने तो पुढे गाभार्या जवळ गेला, तसा मी उठलो , उगाच काही गोष्टी मला पाटल्या नसत्या पण मग माझं शांत झालेलं मन अशांत झालं असत......

सोमवार, १५ मे, २०१७

gyaan

I had to write this, since I was termed as an intellect or it was presumed that  this is the  way which I present myself and Socrates was thrown in the face.

Couple of things, I don't understand Socrates, not sure whether Plato was his teacher or Aristotle or vice versa and mentioned sri sri, since he is the newest philosopher and get lot  of his gyan, which I accept (in my cell) and say thank just not to be rude, since  it is also too heavy. 

I  am just lost nowadays with so many quotes which are shared  which are all Greek and Roman (so this again is just a proverb, neither been to Greece nor Rome), for me bliss is having a drink with Atul and suddenly madan mohan - lata combination song comes up or a simple Jagjit - Gulzar gazhal which I understand, for me  Shankar Mahadevan singing an allap is a beauty which I still don't understand  but is soothing rather than a Kishori Amonkar concert (again nothing against her).  For me  pearl is my kid and wisdom is what you all  my friends share and which i understand , a rickshaw  waala perhaps gives me more gyaan than a spiritual guru, so when some one says pearls of wisdom, I am lost again.  My point was can we just share or talk normal  stuff  rather than a  15 mb video, my memory  is too less (4 gb) on phone and mera dimag usase bhi kam hai. I got the point that mein crib bahut maarta hoon, noted  and understood and agreed, but I am still evolving, still Work in process and improvement suggestions are always welcome.

For me fulfillment or achievement  is when my daughter is not able to sleep some times in the night  and she calls out "baba?" and I say baba aahe ithe, zop tu bala and she is fasst asleep in the next minute.

I am a simple man and this is the problem  with the world, when I say muze kuch nahi samajha  you term me  is an intellect and when most of the guys are trying to prove that they are intellect, we term them as idiots. My knowledge  of cricket is far more superior than philosophy, I can probably list down centuries of Sachin than quotes of the first philosopher to the latest  (I can't remember a single  quote).

So again taken your point, ppl do fwd just to keep in touch, their choice and in a big forum like ours it is difficult, so I would rather chat with individual next time rather than get all of us talking. But please don't give gaali by terming me  as  an intellect, because the only thing i know is i know nothing (ye bhi Manoj ne fwd kiya tha which i understood )

मंगळवार, ७ मार्च, २०१७

देवाच दुकान

आज मला एक अति प्रामाणिक दुकानदार आणि खरा देव भक्त दिसला.  वाटेत येताना  मला एक देवाचं दुकान दिसल. म्हणजे शटर असलेल दुकान, त्यात अनेक मुर्त्या  लाईन मध्ये लावून ठेवल्या होत्या आणि समोर खुर्च्या.  किती प्रामाणिक माणूस, लोक हेच करतात आणि त्याला देऊळ अस गोंडस नाव देतात. हा माणूस बघा, सच्चा आणि प्रामाणिक. एक दिवस मी नक्की जाईन आज गाडीत होतो, पार्किंग चा लोचा असतो, कधी स्कूटर वर आलो कि नक्की थांबेन, दुकानात जाऊन  दहा बारा रुपये देऊन हक्काने आशीर्वाद घेऊन येईन.  

 

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

पुन्हा झी चे कार्यक्रम

पुन्हा झी ....... 

गेल्या खेपेस जेव्हा मी रागाने, झी च्या (बौद्धिक ) घसरण बद्दल लिहिलं होत, तेव्हा वाटलं होत कि अजून किती खाली जाऊ शकतात ही लोक? चुकलो साफ चुकलो, आता रागा  ची जागा "कीव" ह्या भावनेनी घेतली आहे. आता कीव नक्की कुणाची करायची? झी ची? त्यांना भरपूर पैसे मिळतात, कलाकारांची? त्यांना ही पैसे मिळतातच कि, पण त्यांच्या creativity च काय? नुसते पैसे काय हो? अगदी..... कुणीही कमावत . का जनतेची? अगदी  तन,  मन, धन (झी फुकट नाहीये) लावून हे इतके फालतू , निर्बुध्द  आणि खूपदा घाणेरडे कार्यक्रम बघतात म्हणून. 

जय मल्हार : अजून शंभर वर्ष सहज जाईल ती मालिका, अहो देवचं आहे त्यात, त्यामुळे मालिकेला मरण नाही.   तरीही अजून त्या  मल्हर कम शंकर कम पहेलवाना ला अभिनय काही जमत नाहीये.  हळू हळू देवाला माणूस करून सोडणार आहेत कोठारे, मत्सर द्वेष ईर्षा अश्या माणसालाच दिलेल्या भावना देवात दाखवणार. माणसाला देव करणं सोप्प आहे पण  देवाला माणूस? ह्यात खरी creativity ..... 

तुझ्यात जीव  रंगला : खरं तर फार नाही पहिली ती मालिका, पण मला त्या पेहेलवाना  पेक्षा हा जास्त  आवडला. आणि  ती  भाषा पण शोभते त्याला , त्यात पण थोड vyamp पणा घेतलाय पण सध्या टी गरज आहे मराठी महिलांची (पुरुष नाही पाहत एवढ्या चवीने ह्या मालिका)  म्हणजे बघा मालवणी कट्टा नावाच्या हॉटेल मध्ये सुद्धा पनीर मसाला आणि फ्राईड राईस मिळतो ना तश्यातलं आहे, फार कुणी लावून घेत नसेल ही मालीका 

माझ्या नवऱ्याची बायको : बरा वाटायचा मला तो खांडकेकर , बरा म्हणजे बराच चांगला नाही. पण त्या दिवशी हवा येऊ द्या मध्ये तो आणि त्यांच्या सौ आल्या होत्या (ती आवडते मला, गोडे)  तेव्हा इतकी निर्बुद्ध उत्तर दिलीन तेव्हा माझी खात्री पटली  कि हा अगदी योग्य आहे त्या रोल ला. एक तर फार हावभाव करून अभिनय करण्यात त्याला रस नाहीये (RJ होता ना तो?). आणि फार काय नाही  त्यात त्याला करण्यासारखं.  अनिता दाते खरं तर गुणी कलाकार आहे, एकदा एका छोट्या भूमिकेत पहिला होत सुबोध भावे बरोबर,  मग एका लग्नाची दहावी बारावी गोष्टीत. ह्या रोल ला तशी फिट आहे, म्हणजे खूप देखणी बायको दाखवली तर तो एका कुरूप नटवीच्या प्रेमात पडताना दाखवलं तर कस वाटल असत ?  खर  काही हरकत नाही म्हणा,  इतका मूर्ख  पणा लोक खपवून घेतात हे पण खपल असत . लहान पाणी आम्ही challenge नावाचा खेळ खेळायचो त्यात चार एक्के असा दहावेळा तरी लोक करायचे, तस आहे समोरचा काहीच challenge  करत  नाही म्हंटल ना कि द्या थापा (ज्या दिवशी एका ने जरी challenge केला  ना कि बघा, झी च्या समोर तारे चमकतील ).  रोहिणी निनावे ह्या काकू अजून शे दोनशे वर्ष पूर्वीच्या काळात जगतात, म्हणजे अति टुकार मालिका असेल तर  लेखक कोण? हे कळायला फार वेळ लागत नाही. अजून चूल आणि मूल मध्ये गुन्तलेल्या आजी आहेत ह्या. शोभा कपूर एकता  कपूर हे त्यांचे idol असावेत, अजून माहेरच्या साडी मध्ये अडकलेल्या ह्या आज्जी ला झी का म्हणून इतक्या मालीका बिघडवायला देत असेल हे न सुटलेलं कोड आहे. नवऱ्याला डब्बा दिला म्हणजे सॉलिड आहे बाई, बस ह्या  पलीकडे ती  बाई विचार करू शकत नाही. मग ती दुसरी   मुलगी कशी वाईट? तर तिला स्वयंपाक येत नाही आणि काम पण नाही, मग का आवडेल त्याला? बर एक त्या माणसाला मुलं विषयी पण काहीच वाटत नाही? फारच जास्त  आहे हे, मग पोरखेळ  तोंडाला काळ फासा, खाज खुजली टाका असे अतिशय पांचट बिनडोक आणि बाळबोध गोष्टी दाखवून लोकांना हसवण्याचा (का फसवण्याचा?) नीच प्रयोग करणारी ही मालिका. कायद्याने बंदी आणता येईल का  ? हा विचार मी  अगदी मनापासून करतोय, पण वकील म्हणजे झी सारखीच जमात निघाली तर? माझेच पैसे जातील आणि ही जमात श्रीमंत होईल....... अरे हो एक राहीलच , हल्लीच्या हलली फडणवीसांचं भाषण बरेचदा ऐकल, बर बोलतात कि सारखं जाऊन राहील येऊन राहील वगैरे नाही करत ते, पण मग ती राधिका चांगली शिकली सवरलेली ही अशी भाषा का बर बोलते?  (इंग्रजी शिकवत नाहीत काय नागपूरला? )आणि तिला कणा नाही का? तोच उष्टा खरकटा नवराच तिला का हवाय? नागपूरचे लोक चिडत का नाहीत? विदर्भ ला अगदीच असं तस नका समजू एकदा का ते चिडून राहिले ना कि मग बघून राहा बे मुश्किल होऊन जाईल ..... 

ता क : अरुण नलावडे (खूप गुणी कलाकार)ह्यांनी लाजे खातर सोडली म्हणे सिरीयल 

खुलता  कळी खुलेना :   कोण म्हणतं जगात देव नाही? विक्रांतच एक देऊळ पण आहे म्हणे झी च्या स्टुडिओ मध्ये , रोज आरती वगैरे असते, बावन्न बुधवार केले आणि दररोज झी ला पन्नास रुपये दिले कि विक्रांत सारखाच नवरा मिळतो म्हणे (झी मराठी बंद पडणार हे गृहीत धरून नवीन धंदा काढलाय सुभाष जी ह्यांनी) गर्दी रोज वाढते आहे म्हणे. पण मला एकच खटकतंय, त्या मुलीला नाव द्यायचं ना स्वतःच, ती बायको गुणी आहे, क्रेडिट कार्ड दिल कि झालं फार फार तर अजून एक दोन चार लफडी करेल, पण ह्या वेळेस तो आधीच काळजी घेऊ शकेल (गायनेक असल्याचा काय उपयोग?). पण नक्की काय दाखवायचं आहे हे नाही कळलं मला, नाही कळत तेच बरं आहे तस,  मला  त्यांच्या इतका निर्बुद्ध पणा जमणं  कठीण आहे. ह्या सिरीयल मध्ये एक जमेची बाजू म्हणजे दिग्दर्शन आणि अभिनय, पण साला स्टोरी मधेच लोचा, खूप जास्त लोचा अजून किती खेचणार आहेत कुणास ठाऊक.  मी ही फक्त पहिले मिनिट भर सहन करू शकतो किंभहुना  आवर्जून पाहतो कारण त्याचा शीर्षक गीत,  शंभर पैकी दोनशे गुण ...... 

काही दिया परदेस : ही सीरिअल अजून पंन्नास वर्ष नक्की चालेल, फक्त तेव्हा सगळेच हिंदीत बोलतील, म्हणजे मुंबईत अशुद्ध हिंदी आणि बनारस ला शुद्ध, आधी मुंबई मग बनारस मग  परत मुंबई. इथे असलं तरी  आपल्या सारखच वागायचं तिथे पण असच  पण शिव ने इथे पण आपल्या सारखं आणि तिथे पण आणि मधेच एक वाईट सून (चायला हे काय काढलंय कळत  नाही, सून वाईट सासू वाईट). चांगला संसार चालला असेल तरी मोडतील ही लोक वाईट साईट मनात भरवून ..... जाऊदे . 

चूक भूल द्यावी घायवी : मी दिलीप प्रभावलकरचा fan आहे, मला प्रियदर्शन जाधव पण आवडतो त्या मुळे मी ती बघतो.   तरुण पणीची  पण मुलगी चांगली आहे, फक्त सगळीच लोक वयापेक्षा तरुण दिसतात ती म्हातारी  शंभर नाही वाटत आणि आवाज बघा कसला सात मजली लाऊड आहे पण फार्स म्हणून ठीके, अजून तरी हवा तसा विनोद नाहीये .  खरी कसरत जाधव ची आहे (जोशी नाही वाटत तो), त्याला अगदी प्रभावळकरान सारखच करायला लागत,आवाज वगैर चांगला धरलाय, लकबी पण, अभिनय उत्तम हलकी फुलकी मालिका अगदी आवर्जून पाहावी अशी हि नाही आणि पहिली तरी काहीच हरकत नाही.    

नकटीच्या लग्नाला यायचं हा :  काय सीरिअल आहे काहीच कळत नाहीये, नक्की काय म्हणायचं आहे त्यांना काय ठाऊक? उगीच पात्र वाढवून ठेवली आहेत मोठं मोठे कलाकार येतात आणि जातात ..... किती आचरट पणा? जाऊदे मरूदे . 

दिल दोस्ती दोबारा : जस्ट सुरुवात आहे,  पण मला ही आधी पण आवडायची म्हणजे तेव्हा पण टाकाउ न्हवती एवढी तरुण माणसं  असली कि एनर्जी येणारच आणि आता अद्वैत दादरकर आहे दिग्दर्शक, मी बघेन .  फक्त प्राईम टाइम द्यायला हवाय ह्यांना त्या रटाळ सिरीयल पेक्षा केव्हाही बरी ....

चला हवा येऊ द्या : दोन चार मालिकेचा लेखक विनोद आहे कुणीतरी, नावात आहे फक्त विनोद लेखणीत नाही, ते तरी बिचारे किती वेळ करणार हो कॉमेडी, थोडा ब्रेक घेऊन पुन्हा आलेत तरी चालेल.... जुन्या मालिका दाखव तोवर रिपीट     

मी आता न्यूस चॅनेल पाहण्याचा धाडस करणार आहे .... कारण मला त्याच्या वर लिहायचं आहे ...   

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

माणुसकी

दिनेश  गोहिल साहेब हे एक श्वान प्रेमी आहेत, आधी ते (पण) गावठी कुत्र्यांना घाबरायचे, त्यांच्या गल्लीत खूप होती, रात्री अंगावर वगैरे यायचे एकदम. मग वेग वेगळे विचार आले त्यांना संपवण्याचे. अचानक त्यांना वाटलं कि आपण root cause काय आहे हे पाहतच नाही, मग कोणत्या तरी  NGO ला पकडून सगळ्या कुत्र्यांचं operation करून, त्यांची संख्या कमी केली. आता त्यांच्याच घरात एका खोलीत सगळी कुत्री रात्री  झोपतात आणि हेच त्यांचा खाण पिणं आजारपण सगळ  बघतात. मी म्हंटल ग्रेट आहात सर. तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट  सांगितली 

तर हे राहतात मीरा रोड ला , आता खूप पसरलय आणि गाड्यांची वर्दळही वाढलीये .  पण कैक वर्षान पूर्वी विरार ला दर पंधरा ते वीस मिनिटाला एक गाडी होती , तेव्हा रात्री स्टेशन वर वर्दळ पण कमी असायची. एकदा ते दहिसर ला गाडी साठी थांबले होते, साधारण दहा साडे दहा झाले असतील, पावसाळा होता, सगळे प्राणी माणस  गुडूप आडोश्याला बसली होती. तिथे एक म्हातारी आणि म्हातारा होते तिथेच राहत असतील, म्हातारीने एक पिशवी काढली त्यात काही जेवण वगैरे होत, तिने एक थाळी काढली आणि एक हाक दिली, तस एक कुत्र  आल पिशवीतलं थोडं त्याला  दिल  , त्याने खाल्यावर तेच ताट पावसाच्या खाली धून म्हाताऱ्याला दिल , मग तेच स्वछ करून आपण त्यात खाल्लं . तिथेच एक चादर ओढली आणि निजली ते कुत्र पण तिथेच वळकोटी करून झोपलं .

म्हणजे खायची  भ्रांत डोक्यावर छप्पर नाही, तरी माया केवढी आणि ती पण एका भटक्या कुत्र्यावर?   ते म्हणाले  मी अवाक होऊन बघत राहिलो.  त्यातूनच प्रेरणा घेतली असेल म्हणाले. 

पण गोहिल साहेब ग्रेट आहेत .... त्यांची स्टोरी पुन्हा कधीतरी